वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणास लवकर पोहचावे जाताना रत्नागिरीमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर शिक्षकांच्या मिनी बसला अपघात झाला आहे. झालेल्या अपघातामुळे सर्व शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी बाबनदी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. आज सकाळी झालेल्या या भीषण अपघातात सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून शिक्षकांचे प्राण बचावले आहेत मात्र दुर्घटनेत सुमारे 25 शिक्षक जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच या प्रशिक्षणातील दर तासाला असलेल्या हजेरी बाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी आहे की कैद्यांसाठी, असा सवाल कोकण विभागाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपस्थित केला होता.
प्रशिक्षणाला पाच मिनिटे उशीर झाल्यास तुम्हाला प्रशिक्षणातून बाहेर काढले जाईल यावरही आक्षेप घेण्यात आला होता. मात्र आता आज अपघात झाल्यानंतर या अपघातात कोणाच्या कमी जास्त झाल्यास कोण जबाबदारी घेणार असा सवाल आता उपस्थित झाला आहे. सागर पाटील, अध्यक्ष कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी यांनीही याबाबत दोन दिवसांपूर्वीच आक्रमक भूमिका घेतली होती.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. मात्र, इतिहासात प्रथमच या प्रशिक्षणाला शिक्षकांची दर तासाला हजेरी घेतली जात आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी आहे की कैद्यांसाठी, असा प्रश्न केला जात आहे.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांसाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुसार दर तासाला प्रशिक्षणार्थी शिक्षकांची हजेरी घेतली जात आहे. तसेच प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षणस्थळी यायला पाच मिनिटे उशीर झाल्यास संबंधित शिक्षकाला प्रशिक्षणातून बाद करण्यात येईल असा फतवा काढण्यात आला होता.
राज्यातील शिक्षण क्षेत्र शिक्षकांच्या योगदानावर टिकून आहे. महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या देशातील प्रगत राज्य आहे. असे असूनही राज्याचा शिक्षण विभाग व उच्च पदस्थ अधिकारी सातत्याने शिक्षकांवर अविश्वास दाखवत आहे. ते प्रथम थांबवावे. अमानवी पद्धती बंद करून पूर्वीप्रमाणे प्रशिक्षण आयोजित करावे अशी मागणी शिक्षण संघटनांच्या प्रतिनिधींकडून केली जात आहे. प्रशिक्षणातून बाहेर काढले जात आहे. प्रत्येक व्याख्यानानंतर ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. प्रत्येक प्रशिक्षणार्थी शिक्षकांकडून फी घेण्यात आली आहे. परंतु, त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याचे प्रशिक्षणार्थी शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
एक दिवस जरी प्रशिक्षणाला गैरहजर राहिलात किंवा हजेरी ऑनलाईन अपलोड केल्यानंतर पोहचलात तर संपूर्ण प्रशिक्षणातून बाद करण्याच्या संचालकांच्या फतव्याच्या भीतीमुळे आज सकाळी (८ जून) चिपळूण वरून रत्नागिरी जाणाऱ्या प्रशिक्षणार्थीच्या मिनी बसचा मोठा अपघात झाला असून अनेक प्रशिक्षणार्थी त्यात गंभीर जखमी झाले आहेत. प्रशिक्षणाकरीता ७५ टक्के हजेरी ग्राह्य धरण्याबाबत शिक्षण क्रांती संघटना सुरूवातीपासून आग्रही आहे. मात्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आपला १०० टक्के उपस्थितीचा हेका सोडायला तयार नाही. प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे बळी घेतल्यानंतर प्रशासन सवलत देणार आहे काय असा संतप्त सवाल शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर घागस यांनी उपस्थित केला आहे.
जवळच्या नातेवाईकांचे निधन, अकस्मात येणारे आजारपण, वाहतूक कोंडी, अपघात या गोष्टी सांगून येत नाहीत. याकरीता प्रशिक्षणातील उपस्थिती १०० टक्के ऐवजी ७५ टक्के करण्याबाबत शिक्षण क्रांती संघटना आग्रही आहे.
संचालक ऐकत नसतील तर याबाबतचा शासन आदेश निर्गमित करावा असा पर्याय ही संघटेकडून सूचवण्यात आला आहे. मात्र कुणीही दाद देत नाही. त्यामुळे मुकी बिचारी कुणीही हाका असे शिक्षकांबद्दल पुन्हा एकदा म्हणण्याची पाळी आल्याचे घागस यांनी सांगितले.
अपघाताची घटना कशी घडली?
मिनी बसमधून प्रवास करणारे सर्व शिक्षक चिपळूण येथून रत्नागिरी येथे आयोजित प्रशिक्षणासाठी येत होते. तर, सीएनजीने भरलेल्या टँकरने मुंबईच्या दिशेने जात असताना, ट्रॅव्हल्स बसला बावनदीजवळ जोरदार धडक दिली. टँकरच्या धडकेनंतर मिनी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला सुमारे वीस फूट खाली कोसळली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
सीएनजी गळती आणि लागलेली आग
अपघातानंतर टँकरमधील सीएनजी टाकी गटाराशेजारी पडली आणि मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. हवेत पसरलेल्या सीएनजीने अचानक पेट घेतल्याने जवळच असलेल्या एका घराला आग लागली. या आगीत घरासमोरील रिक्षा आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या. घरातील म्हैस भाजली असली तरी, सुदैवाने रहिवाशांनी वेळेवर बाहेर धाव घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातात जखमी झालेल्या शिक्षकांची नावे
या अपघातात जखमी झालेल्या शिक्षकांमध्ये संतोष जागुष्टे, विराज सावंत, मंदार खाडे, स्मिता पाटील, उषा खुडे, जयश्री गावडे, प्रियंका जाधव, स्नेहा मिस्त्री, धर्मेंद्र देरुगडे, दिलीप डोंगरे, सुलक्षणा पाटील, निशिकांत वानरकर, रुपाली यादव, हर्षाली पाकळे, निता बांदरे, मिना घाडगे, कमल महाडिक, प्रेमकुमार शिवगण, अमोल कोनवाल, मनिषा कांबळे, मालिनी चव्हाण, श्वेता चव्हाण, राजेश यादव, गणेश सावर्डेकर, सुरेंद्र सावंत, सचिन पोकळे, उदय खताते, अरविंद सकपाळ, मिना शिरकर आणि रोहित चव्हाण यांचा समावेश आहे.
प्रशासनाची तातडीची मदत
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक विभाग आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. सकाळी पावणे नऊच्या सुमारास टँकरमधील उरलेला सीएनजी सुरक्षितरीत्या बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
वाहतूक व्यवस्थेवर परिणाम
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक चार ते पाच तास ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूंनी अवजड वाहनांच्या रांगा लागल्या असून, प्रशासनाने वाहतूक संगमेश्वर व पाली मार्गे वळवली आहे.
पोलिसांची कारवाई आणि परिस्थिती नियंत्रण
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे घटनास्थळी आपल्या पथकासह उपस्थित असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दल, वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे काम करत आहेत.
0 Comments