Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इंजिनिअरिंगच्या मंजूर प्रवेशक्षमतेच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त.

बहुतांश कॉलेजेसवर आर्थिक संकट
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित सुमारे ४७ इंजिनीअरिंग कॉलेजेसमधील तब्बल ८८०० जागा रिक्त राहिल्या आहेत. तर राज्यातील सुमारे ३५६ इंजिनीअरिंग कॉलेजेसमध्ये मंजूर प्रवेशक्षमतेच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे बहुतांश कॉलेजेसवर आता आर्थिक संकट ओढावले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने शैक्षणिक सत्र २०१९मधील इंजिनीअरिंग प्रवेशाचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात सुमारे एक लाख ३७ हजार ६९० इतकी इंजिनीअरिंग प्रथम वर्षाची प्रवेशक्षमता होती. त्यापैकी ५६ हजार ५२० जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यात नागपूर विभागातील ८८०० जागांचा समावेश आहे. नागपूर विभागात एकूण १८ हजार १४२ जागा आहेत. त्यापैकी ९३४२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. यावर्षी प्रवेशप्रक्रियेला तुलनेने उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावेळी १३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु, केवळ ९३४२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे.
दरम्यान, राज्यात सर्वाधिक प्रवेशक्षमता पुणे विभागात आहेत. पुण्यात इंजिनीअरिंग कॉलेजेसची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. तिथे एकूण ५३ हजार प्रवेश क्षमता असून ३१ हजार ६०० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे सुमारे २१ हजार ४०० जागा रिक्त राहिल्या आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केलेल्या पाहणीनुसार, हजार विद्यार्थ्यांमागे केवळ २०० ते ३०० विद्यार्थ्यांनाच कॅम्पस प्लेसमेंट मिळत आहे. तर पुण्यातील कंपन्यांमध्ये निर्माण होणारा रोजगारदेखील आता कमी होतो आहे. त्यामुळे इंजिनीअरिंगकडील कल कमी होतो आहे.
नागपूर विद्यापीठ क्षेत्रातही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. मिहानमुळे अधिक संख्येने रोजगार निर्माण होतील, या आशेपोटी सुमारे ५६ इंजिनीअरिंग कॉलेजेस सुरू झाले होते. तिथे एकूण २१ हजार २०० इतकी प्रवेश क्षमता होती. परंतु, गेल्या काही वर्षांत दहा कॉलेजेस बंद पडले. त्यामुळे प्रवेशक्षमता आता १८ हजार इतकी कमी झाली आहे. नागपुरात कॅम्पस प्लेसमेंट अगदीच किरकोळ असल्याने विद्यार्थ्यांनी आता इंजिनीअरिंगकडे पाठ फिरवली आहे. त्यातच पुणे व मुंबईच्या तुलनेत नागपुरातही कॉलेजसचे शैक्षणिक शुल्क प्रचंड आहे. त्यातुलनेत येथे नोकरी सहज मिळत नाही. त्यामुळे देखील इंजिनीअरिंगऐवजी बेसिक सायन्सकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे आढळून आले आहे.
तुलनेत फार्मसीची स्थिती चांगली
फार्मसीला १३७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर २९५ जागा रिक्त राहिल्या आहेत. तुलनेने फार्मसीतील कमी जागा शिल्लक राहिल्या आहेत. तर पॉलिटेक्निकच्या १३ हजार १२६ जागांसाठी ६ हजार ४९४ अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यातून ६ हजार २५८ जागांवर प्रवेश देण्यात आले. त्यामुळे पॉलिटेक्निकच्या निम्म्याच जागा भरल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

close