पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी ऐवजी इ. ४ थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी ऐवजी इ. ७ वी मध्ये आयोजित करणे, परीक्षेचे नामाभिधान प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) असे करणे, परीक्षेच्या अटी व शर्ती तसेच शिष्यवृत्ती संच प्रकार, मंजूर संच संख्या, शिष्यवृत्तीचे दर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निवड व करणेबाबतचे सुधारीत निकष शासन निर्णय
शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठी वेबसाइट
www.ScholarshipExamStudy.com
राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभा आहे. राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे. शिष्यवृत्ती मिळविणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गरीब, होतकरू, हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन १९५४-५५ पासून कार्यान्वित असून त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम २००९ या कायद्यामधील तरतूदी लक्षात घेवून संदर्भाधीन अनुक्रमांक २ मधील दिनांक २९/०६/२०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता ४ थी ऐवजी इयत्ता ५ वी व इयत्ता ७ वी ऐवजी इयत्ता ८ वी असा करण्यात आला होता.
त्यानुसार या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन २०१६-१७ पासून इयत्ता ५ वी व ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे करण्यात येत आहे. तथापि शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलानंतर एकूण प्रविष्ठ विद्यार्थी संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, विद्यार्थी व शिक्षक यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, या हेतूने शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर पुन्हा इ. ५ वी ऐवजी इ. ४ थी व इ. ८ वी ऐवजी इ. ७ वी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुषंगाने संदर्भीय शासन निर्णयात नमूद केलेल्या अटी व शर्तीत सुधारणा करून सर्वसमावेशक बाबींचा एकच शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
१ सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता ५ वी ऐवजी इयत्ता ४ थी आणि इयत्ता ८ वी ऐवजी इयत्ता ७ वी असा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
2) त्याचप्रमाणे यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नामाभिधान "प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर)" असे करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
३) सदर बदलाची अंमलबजावणी सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी. त्यामुळे सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात एक वेळची बाब म्हणून इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन (अंतिमतः) साधारणतः फेब्रुवारी २०२६ च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल. तसेच इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे २०२६ च्या कोणत्याही रविवारी घेण्यात येईल. (सोबतच्या प्रपत्र अ नुसार इ. ४ थी व इ. ५ वी करीता प्रत्येकी १६६९३ व प्रपत्र ब नुसार इ. ७ वी व इ. ८ वी करीता प्रत्येकी १६५८८ शिष्यवृत्ती संच मंजूर राहतील)
४) सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन २०२६-२७ पासून पुढे इ. ४ थी व इ. ७ वी वर्गांसाठी नियमितपणे करण्यात यावे.
5) प्रस्तुत बदलांमुळे अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये होणाऱ्या बदलांबाबत आवश्यक ती कार्यवाही शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी करावी.
6) सदरची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात येत आहे.
7) सदर परीक्षेच्या आधारे सर्व शासकीय शाळांतील शिक्षकांच्या कार्याचे मुल्यांकन करण्यात येऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात / गोपनीय अहवालात करणे बंधनकारक राहील.
8) पोलीस बंदोबस्त : सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे गोपनीय साहित्य ठेवण्याच्या जिल्हा / तालुका परिरक्षक केंद्रास परीक्षा साहित्य प्राप्त झाल्यापासून परीक्षेनंतर परीक्षा परिषदेस सुपूर्द करेपर्यंत, तसेच परीक्षेच्या दिवशी सर्व शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रांवर निःशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. सदर पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांची राहील.
9) प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी स्तर) करीता अटी व शर्ती पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत :-
१) शासनमान्य (शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील.
२) सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. व इतर अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे :-
1. सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शासन निर्णयान्वये सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील.
॥. सदर विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेस या शासन निर्णयान्वये बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे विहीत शुल्क आकारण्यात येईल.
iii सदर विद्यार्थ्यांची स्वतंत्र राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
IV. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीकरीता संपूर्ण राज्यातील पहिल्या १०० विद्यार्थ्यांची व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीकरीता प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. सदर गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रम कळविण्यात येईल, मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही.
V. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील.
३) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :-
१) विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२) विद्यार्थी शासनमान्य शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित शाळेत
3) इयत्ता ४ थी किंवा इयत्ता ७ वीत शिकत असावा.
४) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा :-
विद्यार्थ्याचे वय संबंधित शैक्षणिक वर्षाच्या १ जून रोजी खाली दर्शविलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे.
Img
५) सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल. शिष्यवृत्तीस पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० % गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. प्रत्येक पेपरमध्ये ४०% पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अपात्र राहतील. जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्तीच्या संचानुसार अशा पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस पात्र घोषित करण्यात येईल.
६) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या परीक्षेच्या आधारे सदर शिष्यवृत्ती दिली जाईल.
७) परीक्षेची तारीख व वार
क) सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून यापुढे शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल, त्यानुसार साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवारी परीक्षा घेण्यात येईल.
ख) शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.
८) अर्ज :-
सदर परीक्षेसाठीचे अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पध्दतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावेत.
शिष्यवृत्ती परीक्षा शाळा व विद्यार्थी नोंदणी लिंक - Click Here
९) परीक्षा शुल्क :-
बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी -
प्रवेश शुल्क रु. ०५०/-
परीक्षा शुल्क रु. १५०/-
एकूण
रु. २००/-
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, भटक्या जाती-विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी -
प्रवेश शुल्क
रु. ०५०/-
परीक्षा शुल्क रु. ०७५/-
एकूण
रु. १२५/-
याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी रु. २००/- नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल.
१०) परीक्षेचे माध्यम :-
मराठी/उर्दू/हिंदी/गुजराती/इंग्रजी/तेलुगु/कन्नड असे असेल. इ. ४ थी व इ. ७ वीच्या सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकरीता गणित या विषयाचा इंग्रजी माध्यमाकरीता जी प्रश्ननपत्रिका असेल तिच प्रश्ननपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येईल.
११) परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरुप :-
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी तयार केलेल्या इ. १ ली ते इ. ४ थीच्या पाठ्यक्रमावर आधारित परीक्षा परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व इ. १ ली ते इ. ७ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) आयोजित करण्यात येईल.
पूर्वीप्रमाणेच सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील.
प्रश्नांची काठिण्य पातळी:-
१) कठीण स्वरुपाचे प्रश्न ३०%
२) मध्यम स्वरुपाचे प्रश्न ४०%
३) सोपे स्वरुपाचे प्रश्न ३०%
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप :- प्रत्येक प्रश्ननपत्रिकेसाठी बहुसंच (A.B.C.D.) प्रश्नसंच पुरविण्यात येतील.
१) प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७वी स्तर) या दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल.
२) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी स्तर) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल, परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी स्तर) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.
१३) शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी :-
१) शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याने लगतच्या वर्षी मान्यता प्राप्त पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) / पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल.
२) प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) पास झाल्यानंतरच्या वर्षापासून ३ वर्ष व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) पास झाल्यानंतरच्या वर्षापासून ३ वर्ष शिष्यवृत्ती चालू राहील. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकाला नियमित उपस्थिती, चांगले वर्तन व समाधानकारक प्रगती या अटींची पूर्तता करावी लागेल. यापैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती मिळणार नाही.
३) विद्यार्थ्याने शाळा बदल केल्यास, संबंधित विद्यार्थ्याने / पालकाने शिष्यवृत्तीसाठी नवीन मुख्याध्यापकांमार्फत संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (योजना) / शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.
४) शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या परवानगी शिवाय कोणीही शिष्यवृत्ती गोठवू शकणार नाही.
0 Comments