दहावी-बारावीसाठी आता एकत्रित गुणपत्रक-प्रमाणपत्र; महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. यापूर्वी दहावी व बारावी परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र वेगवेगळे दिले जात होते. मात्र, आता प्रथमच हे दोन्ही प्रमाणपत्रे एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी ही माहिती परिपत्राद्वारे दिली आहे.
नवीन प्रणालीअंतर्गत विद्यार्थ्यांचे नाव 'पहिले नाव वडिलांचे नाव आडनाव' या क्रमाने छापले जाणार आहे. त्यामुळे अधिकृत कागदपत्रांमध्ये सुसंगती राखण्यास मदत होणार आहे. दरम्यान, काही प्रवेशपत्रांवरील छायाचित्रे अस्पष्ट असल्याने विद्यार्थ्यांना योग्य फोटो चिकटवून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्याची स्वाक्षरी घेण्याच्या सूचना पूर्वीच देण्यात आल्या होत्या.
आता गुणपत्रकावर अचूक छायाचित्र छापले जावे यासाठी मंडळाने संकेतस्थळावर 'छायाचित्र सुधारणा' ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्यक बदल करून माहिती पुन्हा सादर करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, नावाच्या क्रमात काही त्रुटी असल्यास त्या तातडीने विभागीय मंडळामार्फत दुरुस्त करण्यास सांगण्यात आले असून, याबाबत सर्व शैक्षणिक संस्थांना सूचना देण्यात आल्या आहेत.




0 Comments