सोपी वाक्ये व उतारा वाचन विविध नमूने पहा. मुलांकडून वाचन करुन घ्या. तसेच इयत्ता व वयोगट लक्षात घेऊन तुम्ही वेगवेगळे किंवा पाठ्यपुस्तकांतील परिच्छेदही निवडू शकता. येथे सोपी वाक्ये ते मोठे उतारे वाचनासाठी दिलेले आहेत. हे उतारे स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी पडतील.
महत्त्वाचे - सदर वाक्य / उतारे यांचा वापर श्रृतलेखनासाठी देखील करता येईल. सदर उतारा / वाक्य वाचन झाले नंतर त्यावर आधारित किमान तीन प्रश्न मुलांना विचारावेत म्हणजे वाचलेले कितपत लक्षात राहिले आहे याचा पडताळा घेता येईल. यामुळे समजपूर्वक वाचन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी मदत होईल.
संच १ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
कपिला गाय आहे .
कपिला गाय गोठ्यात आहे.
कपिला गाय चारा खाते.
कपिला गाय दुध देते.
मुले आवडीने दुध पितात.
संच २ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
तळे सुंदर आहे.
तळ्यात बगळा उभा आहे.
तळ्यात मासे पोहत आहेत.
बगळ्याने मासा पकडला.
मासा घेऊन बगळा उडाला.
संच ३ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
टोपलीत फळे आहेत.
आई फळे स्वच्छ करते.
बाबा आंबा खातात.
सई पपई खाते.
दादा अननस खातो.
मला सर्व फळे आवडतात.
आईला सुद्धा सर्व फळे आवडतात.
संच ४ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
सुषमा लिहित होती.
तिच्या अक्षरात जादू आहे.
सुषमाचे अक्षर सुंदर सुबक आहे.
तिची वही सगळ्यांना हवी असते.
तिला लिखाणाची आवड आहे.
ती दररोज पाच ओळी शुद्धलेखन लिहिते.
संच ५ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
एवढासा उंदीर होता.
त्याने घरात धुमाकूळ घातला.
आईच्या साडीवर त्याने नक्षी काढली.
बाबांच्या पायमोजाला दोन खिडक्या केल्या.
संच ६ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
गंगा आजी झोपडीत राहते.
तिची झोपडी रामाच्या घराशेजारी आहे.
गंगा आजीच्या घरात मांजर आहे.
ती मला खूप आवडते.
गंगा आजी खूप प्रेमळ आहे.
संच ७ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
सरू एक गरीब मुलगी आहे.
ती दुसरीत शिकते.
तिची आई शाळेजवळच्या चौकात लिंबू विकते.
त्या पैशांवर त्यांचे घर चालते.
संच ८ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
चैताली गुणी मुलगी आहे.
ती दररोज शाळेत जाते.
घरी आल्यावर ती घरचा अभ्यास करते.
नंतर ती आईला मदत करते.
संच ९ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
फुगेवाला आला.
त्याने लाल, निळे फुगे आणले.
मुलांनी फुगे घेतले.
मुलांच्या हातातून फुगे सुटले.
मुले फुग्यांच्या मागे सैरावैरा धावत सुटली.
संच १० (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
एक आजी होती.
एकदा तिला तिच्या बहिणीचे पत्र आले.
आजीला तिने आपल्या घरी पूजेला बोलावले होते.
आजी गाडी करुन तिच्या घरी गेली.
पूजेला भरपूर लोक आले होते.
संच ११ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
आमच्याकडे एक किसणी आहे.
तिच्यावर बारीक किसले जाते.
आम्ही खोबरे किसून चटणी करतो.
आई गाजरे किसून हलवा करते.
संच १२ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
चिंच फार आंबट असते.
हिरव्या चिंचा छान लागतात.
जेवणात चवीला चिंचा वापरतात.
चिंचोके भाजून खातात.
चिंचोके पासून चंपुळ्या करतात.
संच १३ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
आमच्याकडे एक किसणी आहे.
तिच्यावर अनेक प्रकारचे पदार्थ किसले जातात.
आम्ही खोबरे किसून वाटप करतो.
आम्ही गाजर किसून हलवा करतो.
किसणीचे वेगवेगळे प्रकार असतात.
संच १४ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
बसमध्ये कंडक्टरकाका असतात.
ते आपल्याला तिकीट देतात.
स्टॉप आला कि घंटी वाजवतात .
मग ड्रायव्हर काका बस थांबवतात.
आता टिकिट मशीनद्वारे तिकिट काढले जाते.
संच १५ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
मेंढीच्या अंगावर लोकर असते.
लोकरीपासून धागा काढतात.
त्या धाग्यांचे स्वेटर विणतात.
स्वेटर थंडीत वापरतात.
लोकरीपासून घोंगडी, कानटोपी बनवतात.
संच १६ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
मगर पाण्यात व जमिनीवर आढळते.
ती पाण्यात पोहू शकते.
जमिनीवर चालू शकते.
ती उन्हात बसून अंग शेकते.
संच १७ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात.
कावळा काटक्यांचे घरटे बांधतो.
सुगरण गवताचे घरटे विणते.
शिंपी पानांचे घरटे शिवतो.
संच १८ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
नारळाचे झाड उंच असते.
नारळाची चटणी करतात.
नारळाच्या करंज्या करतात.
नारळ मसाल्यात घालतात.
सत्काराला नारळ देतात.
संच १९ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
पळसाच्या पानांचे द्रोण करतात.
त्याच्या पत्रावळीही करतात.
पळसाची फुले लाल असतात.
फुलांपासून लाल रंग मिळतो.
संच २० (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
कच्चा आंबा म्हणजे कैरी.
कैरीचे लोणचे करतात.
कैरी पिकली की पिवळी होते.
पिकलेल्या आंब्याचा रस करतात.
संच २१ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
शाळेला मोठे मैदान आहे.
सकाळी मैदानात प्रार्थना होते.
दुपारी आम्ही तिथे खेळतो.
मैदानात धमाल येते.
संच २२ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
सखाराम बांगड्या घेऊन येतो.
रेशमी बांगड्या , वर्खी बांगड्या.
लाल हिरव्या , सोनेरी बांगड्या.
तो बांगड्या भरून देतो.
संच २३ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
फणसाला वरून काटे असतात.
फणसाचे गर गोड लागतात.
गऱ्यात आठळी असते.
फणस खोडावर लागतात.
कापा व बरका असे फणसाचे दोन प्रकार असतात.
संच २४ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
दिवस आणि रात्र यांचा पाठ शिवणीचा खेळ आपण रोज पाहतो.
दिवसानंतर रात्र येते.
आणि रात्री नंतर पुन्हा दिवस येतो.
दिवसा सर्वजन काम करतात.
रात्री सर्वजण झोप घेतात.
संच २५ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
रामू नावाचा एक शेतकरी होता.
तो शेतात खूप कष्ट करत असे.
त्यामुळे त्याच्या शेतात भरपूर पिक येत.
त्याला तीन मुले होती.
तीनही मुलगे खूप आळशी होते.
संच २६ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
सुगरण नावाचा पक्ष्याचा खोपा झाडाच्या शेंड्यावर असतो.
वाळलेल्या गवताच्या कड्यांच्या साहाय्याने ते घरटे विणतात.
घरट्याच्या आत कापूस, कागद, कापड गोळा करून ते खोप्यात ठेवतात.
सुगरणीचा खोपा खूप रेखीव असतो.
संच २७ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
मनू शाळेच्या पायऱ्या उतरत होता.
अचानक त्याला मुसमुसण्याचा आवाज आला.
त्याला पायरीवर फुलपाखरू पडलेले दिसले होते.
त्याने अलगद उचलले व सूर्यफुलाच्या शेतात अलगद सोडले.
संच २८ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
गाय पाळीव प्राणी आहे.
गाय गवताचा चारा खाते.
गायचे दुध सर्वांना आवडते.
गायच्या शेणाचा उपयोग सारवण्यासाठी करतात.
शेणाचा उपयोग बायोगॅस साठी करतात.
दिवाळीत वासू बारसेच्या दिवशी तिची पूजा करतात.
संच २९ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
कुत्रा पाळीव प्राणी आहे.
तो घराची तसेच शेताची राखण करतो.
याशिवाय तो अनेक कामात आपल्याला मदत करतो.
पोलिसांनाही त्याची मदत होते.
कुत्र्याला त्रास देऊ नये.
तो आपला मित्र आहे.
संच ३० (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
हत्ती हा जंगली प्राणी आहे.
तो शाकाहारी प्राणी आहे.
त्याच्या लांब दातांना सुळे म्हणतात.
हत्तीला लांब सोंड असते.
सोंडेचा उपयोग अन्न तोंडात घालण्यासाठी व वस्तू उचलण्यासाठी करतो.
संच ३१ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
पोपट अनेक प्रकारचे असतात.
आपल्या परिसरात आढळणारा पोपट हिरव्या रंगाचा असतो.
त्याची चोच लाल चुटूक असते.
त्याच्या गळ्याभोवती काळा पट्टा असतो.
तो पट्टा गोफ घातल्या सारखा दिसतो.
संच ३२ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
रामू मडकी, विटा बनवत असे.
त्याने गाढव, कुत्रा हे प्राणी पाळले होते.
कुत्रा घराची राखण करत असे.
गाढव स्वत:च्या पाठीवरून माती, विटावाहून नेत असे.
रामू नेहमी कुत्र्याला बाजारात सोबत नेत असत.
त्यामुळे गाढवाला कुत्र्याचा खूप राग येई.
संच ३३ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
एका जंगलात वानरांची वस्ती होती.
ते नेहमी झाडांवर वास्तव्य करत.
ऐके दिवशी लाकुडतोड्या झाडे तोडायला आला.
ते पाहून वानरांचे पित्त खवळले.
त्यांना वाटले लाकुडतोड्याचा बेत आपल्याला हुसकून लावण्याचा आहे.
म्हणून वानरांनी त्याच्यावर हल्ला केला.
संच ३४ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
सूर्याच्या कोवळ्या किरणांबरोबरच सूर्यपक्षी फुलाफुलांमधील मध शोधायला फुलांवर तुटून पडतात.
सूर्यपक्षी आकाराने चिमुकला असतो.
सूर्यपक्षी गडद जांभळ्या रंगाचा असतो.
एका जागी फार काळ तो थांबत नाही.
भुंग्याप्रमाणे तो सतत फुलांवर बागडणारा पक्षी आहे.
संच ३५ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
छोटे आजार घरगुती उपचारांनी बरे होऊ शकतात.
घरातील अनुभवी, वडीलधार्या व्यक्तींना असे घरगुती उपाय माहीत असतात.
सर्दीमध्ये गरम पाण्याचा वाफारा घेतात, छाती शेकतात.
उलट्या होत असतील तर लिंबाचे सरबत देतात.
संच ३६ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
आदिमानव शेती करायला लागला.
त्याची शेती पाण्याजवळ असे.
तो शेताजवळ वस्ती करून राहू लागला.
अशाप्रकारे वाड्यावस्त्या तयार झाल्या.
या वाड्यावस्त्यांची पुढे गावे झाली व गावांची वाढ होऊन शहरे निमार्ण झाली.
संच ३७ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतात, तिथेच ते सजीव आढळतात.
वाघाच्या गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात, म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो.
तर जी वनस्पती पाणवनस्पती नाही, ती पाणथळ जागी तग धरत नाही.
संच ३८ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
जून महिन्यात आभाळात सगळीकडे काळे ढग हजेरी लावू लागतात.
ढगाबरोबर पावसाळ्याची चाहूल लागते.
तोपर्यंत बाजारात फणस, करवंदे आणि जांभळे आलेली असतात.
पहिल्या पावसाची चातक पक्षी वाट पाहत असतो.
कोकिळा आपल्या आवाजाने पाऊस येण्याची चाहूल देत असतो.
संच ३९ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही.
म्हणून पाण्याचा स्त्रोत मानवी वस्तीच्या शक्य तितकाजवळ असणे गरजेचे असते.
त्यामुळे प्राचीन काळी नगरे वसली ती कुठल्यातरी मोठ्या नदीच्या तीरावर.
आपल्या देशातअशी अनेक शहरे आहेत.
उत्तर भारतात यमुना नदीवरील दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे.
संच ४० (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत.
त्यांना झाडांमुळे आधार व अन्न मिळते.
त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात.
त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवतात.
काही पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो.
माकडे झाडांवरच झोपतात.
संच ४१ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
शिवानी कुदांपूरच्या
संच ४२ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
माणिक व हिराबाई यांचे एक कुटुंब होते.
त्यांच्याकडे दोन बैल होते.
त्यातील एक बैल चोरीला गेला.
हिराबाई चतूर होती.
तिने बैलाचा शोध लावला.
संच ४३ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
चिंचपूर नावाचे गाव होते.
गावाजवळ ओढा होता.
ओढ्याच्या बाजूला एक वडाचे झाड होते.
त्याचे नाव वडेश्वर असे होते.
झाडाची पाने हिरवीगार होती.
झाडावर चिमणी, कावळा, मैना, राघू, खारुताई राहायचे.
संच ४४ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
एक चिंटू होता.
तो रोज सकाळी उशिरा उठायचा.
आंघोळ न करताच शाळेत जायचा.
विस्कटलेले केस, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची.
त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही.
एके दिवशी ऋतुजाताईने त्याला समजावले.
मग चिंटू दररोज लवकर उठून आंघोळ करु लागला.
संच ४५ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
भारत आपल्या सगळ्यांचा देश.
भारतात उंच पर्वत आहेत.
घनदाट जंगले तसेच वाळवंट देखील आहेत.
लहानमोठ्या नद्या आहेत.
नद्याकाठी गावे आहेत. गावात लोक राहतात.
त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात. ते वेगवेगळे सण साजरे करतात.
आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे.
जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे.
संच ४6 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
कोण्या एका जंगलामध्ये एक माकड राहत होते. ते माकड खूप हुशार होते. एक दिवस तो एका उंच डोंगरावर गेला. डोंगरावर त्याला एक पिशवी सापडली. त्यामध्ये एक आरसा आणि मिरच्या होत्या. माकडाने पहिले एक मिरची खाल्ली. मिरची खूपच तिखट होती. त्याने मिरच्या फेकून दिल्या. त्याने आरसा घेतला आणि उलटा सुलटा करून पाहिला. तेव्हा आरशावर सूर्याची किरणे पडली आणि त्याचे डोळे चमकले. माकडाने आरशाला स्वतःच्या जवळ नेले.
संच ४7 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
एक होती मुलगी. तिचे नाव लीला. होती ती चौथीत अन् होती भारी खोडकर. लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे. पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस. स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची. त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची. तिचे घर होते गावाच्या एका टोकाला. तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेली की नदी होती.
संच ४8 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
पाऊस पडेल, या आशेने शेतकरी पेरणी करतात. त्याला 'धूळपेरणी' म्हणतात. पाऊस लवकर पडेल अशी त्यांना आशा असते. पाऊस उशिरा पडला किंवा फारच कमी पडला तर पेरलेलं बी वाया जाते. दुबार पेरणी करावी लागते. हा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही आणि दुबार पेरणीचे पीकही पहिल्या पेरणी सारखे चांगले येत नाही. कधी पाऊस खूप पडतो तर कधी पडतच नाही. उगवलेले पीक वाया जाते. शेतात पीक पिकले तरी पिकावर अनेक वेळा रोग पडतो. कडाक्याची थंडी पडून देखील पीक वाया जाते आणि शेतकरी अडचणीत सापडतात.
संच ४9 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
'शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे' हा विचार सयाजीराव महाराजांनी स्वीकारला. समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे यासाठी त्यांनी बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा केला. त्यांनी अनेक गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून परदेशी पाठवले. गोरगरिबांची व दलितांची पिळवणुकीतून सुटका केली. सर्व जाती धर्मातील लोकांना शाळांमध्ये प्रवेश देण्यास सांगितले. त्यांनी सार्वजनिक ग्रंथालयाचाही कायदा केला व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिले.
शेतीची प्रगती करण्यासाठी धरणे बांधली. शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी छळणूक थांबवली. लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी सयाजीरावांनी कापडाची गिरणी सुरू केली. अनेक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले. त्यांना देशाबद्दल प्रचंड प्रेम होते.
संच 50 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
गेला रविवार आम्ही अगदी मजेत घालवला. जेवणाचे डबे घेऊन सकाळी अगदी लवकर आम्ही शाळेत जमलो. आम्ही बस ने निघालो. बुलढाण्याहून दोन तासात आम्ही लोणार तालुक्याला पोचलो. लोणार ला पोहोचल्यावर तिथल्या जगप्रसिद्ध सरोवर आला जाण्याआधी आम्ही नाष्टा केला. लोणार सरोवराला आम्ही जाणार हे कळल्यापासून वर्गात एकच चर्चा होती. आम्ही त्याविषयी घरच्यांना, शेजाऱ्यांना माहिती विचारत होतो.
सरोवराजवळ येताच आम्ही भराभर बस मधून बाहेर पडलो. तिथली माहिती सांगणारे गाईड आमची वाटच पाहत होते. ते म्हणाले, "मुलांनो, हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सर्व तयार झाले. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. आश्चर्य म्हणजे एवढ्या खाऱ्या पाण्याच्या सर्व वराभोवतालच्या विहिरीचं पाणी गोड आहे. अशा प्रकारचे हे भारतातलं एकमेव सरोवर आहे."
संच 5१ (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार
नाशिक मधील बापू गायधनी यांनी भीषण आगीतून लहान मुलांना व जनावरांना वाचवले. त्यासाठी त्यांनी स्वतःचा प्राण गमावला. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या त्यांच्या या अतुलनीय शौर्याच्या स्मरणार्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूर मुला-मुलींना वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. दरवर्षी असे जास्तीत जास्त तीन पुरस्कार दिले जाऊ शकतात.
राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्या वतीने दिले जाणारे हे शौर्य पुरस्कार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीने दिले जातात. रोख रक्कम, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. कोणत्याही वर्षी 30 सप्टेंबर पर्यंत पुरस्कारासाठी नावे पाठवावी लागतात.
संच 52 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
चवदार तळ्याचा सत्याग्रह
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात 'चवदार तळे' नावाचे एक तळी आहे. स्वातंत्र्यापूर्वी या तळ्यावर इतर ठिकाणांप्रमाणे दलितांना पाणी भरण्याची बंदी होती. सर्व लोकांना पाणी मिळावे असा कायदा करूनही जातीभेदामुळे दलितांना चवदार तळ्याच्या पाण्याला हात करण्याची देखील मनाई होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जुलमी रूढीचा धिक्कार केला. 'चवदार तळे' सर्वांना खुले व्हावे म्हणून त्यांनी महाड येथे सत्याग्रह केला. हजारो लोकांच्या उपस्थितीत 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः तळ्याचे पाणी पिऊन एक अन्यायी परंपरा संपवली. दलिता बरोबर सवर्ण सुधारक देखील या लढ्यास सहभागी झाले होते. अस्पृश्यता पाळणे, माणसांनी एकमेकांना हीन लेखणे अशा विषमतेच्या परंपरांना डॉक्टर आंबेडकरांनी संघटित विरोध केला. स्त्रियांना, दलितांना समतेने, समानतेने, जगण्याचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी आयुष्यभर अपार संघर्ष केला. 'चवदार तळे' ही जागा अशाच एका प्रसंगाची साक्षीदार आहे.
संच 53 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
जननायक बिरसा मुंडा
बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व करमी या आदिवासी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव उलिहातू हए रांची जवळ आहे.
बिरसाचे आई-वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता.
1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले. तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता. यावेळी बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले.
आपल्या २५ वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले. त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.
संच 54 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
भारतरत्न
'भारतरत्न' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो. या राष्ट्रीय सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे. या सन्मानाचा प्रारंभ २ जानेवारी १९५४ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या काळात केला गेला.
सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती. इ. स. १९५५ मध्ये हा नागरी सन्मान मरणोत्तरसुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली. हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना देण्यात येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इ. स. १९५४ साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले.
संच 55 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
भारत अतिप्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. अनेक देशांतील लोक इथल्या महान आचार्यांकडून शिक्षण घेण्यासाठी भारतात येत. कारण भारत हे विद्येचे केंद्र होते. त्या काळात भारत लहान मोठ्या - व्यापाराचेही केंद्र होते. भारतीय माल सर्व जगभर प्रसिद्ध होता. पूर्वकडचे आणि पश्चिमेकडचे व्यापारी खुष्कीने आणि समुद्रमार्गे येत. हे भारतीय माल खरेदी करायला येत. समुद्रमार्गे व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे.
भारत पुन्हा व्यापार आणि उद्योगाचे केंद्र बनत आहे. भारतीय माल अनेक देशांकडे निर्यात केला जातो. भारतीय तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ अनेक परदेशांत काम करतात. भारतातून खाद्यपदार्थांच्या विक्री मोठ्या प्रमाणात केल्या जातात. इंधन व इलेक्ट्रॉनिक्स पार्ट भारतात आयात केले जातात. भारताने मुक्त व्यापार धोरण अवलंबिवले आहे.
संच 56 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
अजितचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमले होते. त्याला अनेक भेटी मिळाल्या. पुस्तके, खेळणी आणि कपडे. अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली. एक गुलाबाचे रोप. अजितला सगळ्यात आत्याची भेट आवडली. तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले. त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले. सकाळी उठल्याबरोबर तो ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला. एके दिवशी त्याला गुलाबाच्या दोन कळ्या डोकावताना दिसल्या. तो निरीक्षण करीत राहिला, त्या कळ्या उमलल्या आणि त्यांचे सुंदर पिवळे गुलाब झाले. त्याला आनंद झाला आणि तो उत्तेजित झाला. आईच्या मदतीने त्याने ती फुले खुडली. त्याने पहिले दोन गुलाब आईला आणि बहिणीला भेट दिले. अजितने आपल्या बागेत आणखी रोपे रोवण्याचे ठरवले.
संच 57 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
चंदा नावाची एक मुलगी होती. ती नदीच्या काठी खेळत होती. खेळता खेळता तिला तहान लागली. नदी तर आटून गेली होती. तिला वाळूत एक लहान खड्डा दिसला. त्याच्यात थोडे पाणी होते. खड्ड्यातील पाणी ओंजळीत घेऊन ते पिणार एवढ्यात एक ससा तिच्याजवळ आला. तो खूप तहानलेला होता. थकून गेला होता. ते पाहून तिने पाण्याची ओंजळ त्याच्या तोंडाजवळ धरली. सशाने घटघटा पाणी पिऊन टाकले व आनंदाने उड्या मारत निघून गेला. चंदाला पण खूप आनंद वाटला.
संच 58 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
कडूनिंबाचे झाड - आपल्या बिया, साल आणि पाने यांच्या औषधी फायद्यांमुळे निंबाचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात. त्याचा अर्थ आहे परिपूर्ण, अविनाशी आणि संपूर्ण. कीटकनाशक म्हणून निंबाचे तेल महत्त्वाची भूमिका निभावते आणि डासांच्या निवारणासाठीही पर्याय ठरतो. निंबाच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरता येतात. निंबाच्या पानांचा लगदा कांजिण्यांवर उपयोगी पडतो. निंबाच्या डहाळ्यांना 'दातून' म्हणतात आणि त्या खेड्यांमध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. साल आणि मुळ्या यांचे चूर्ण करून ते पाळीव प्राण्यांवरील उवा आणि गोचिडी यांच्या नियंत्रणासाठी वापरले जाते.
संच 59 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
गणू शेतावरून एकटाच घरी निघाला होता. वाट वाकडी तिकडी होती. वाटेवर एक मोठे झाड होते. झाडावर खूप माकडे होती. ती माकडे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना त्रास द्यायची. गणू दिसताच माकडे मोठमोठ्याने आवाज करू लागली. उंच उड्या मारू लागली. हूप हूप असा आवाज करत खाली आली. गणूला पहिल्यांदा मजा वाटली; पण माकडे खाली उतरून त्याच्या अंगावर धावून येऊ लागली, तेव्हा गणू घाबरला. पळत सुटला. गणू पुढे अन माकडे मागे. गणू घामाघूम झाला.
संच 60 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
५ जूनला पर्यावरण दिन असतो. दरवर्षी आमच्या गावात पर्यावरण दिन साजरा करतात. सरपंचांनी गावात मोठी सभा घेतली. सभेत जयश्रीने भाषण केले. जयश्री म्हणाली, “झाडे तोडू नका, झाडे लावा झाडे जगवा. झाडे वाढवा. झाडे वाढली तर पाऊस पडेल. पाऊस पडल्याने शेती पिकेल. चारापाणी भरपूर मिळेल.” भाषण चांगले झाले. सर्व गावकऱ्यांनी एकेक झाड लावून ते वाढवण्याचा दृढ निश्चय केला. सरपंचांनी जयश्रीला पुस्तक बक्षीस दिले.
संच 61 (शालेय शिक्षण www.shaleyshikshan.in)
एक कुत्रा रस्त्याने चालला होता. त्याला रस्त्यावर एक भाकरीचा तुकडा सापडला. भाकरीचा तुकडा धरून तो धावू लागला. तो एका विहिरीजवळ थांबला. कुत्र्याने पाण्यात पाहिले. त्याला पाण्यात एक कुत्रा दिसला. त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा दिसला. कुत्र्याला वाटले, पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा हिसकावून घ्यावा. कुत्रा भुंकू लागला, तोच त्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा पाण्यात पडला. पाण्यात दुसरा कुत्रा नसून ते प्रतिबिंब होते हे कुत्र्याच्या लक्षात आहे.
तात्पर्य - अतिलोभामुळे स्वतः चे नुकसान होते.
0 Comments