समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन २०२4-25 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत.
राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहे. दिनांक १३ जून, २०११ च्या शासन निर्णयान्वये पुरस्काराची रक्कम रु. १०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) अदा करण्यात येते. तसेच राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) अदा करण्यात येते.
सन २०२4-25 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक २5 ऑगस्ट, २०२5 रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने संदर्भ क्र.६ येथील दिनांक 25 ऑगस्ट, २०२5 च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली. त्यानुसार सन २०२4-२5 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय १09 शिक्षकांची खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निवड केली आहे.




0 Comments