Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती | निबंध | भाषण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती | निबंध | भाषण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा - Click Here


भीमराव रामजी आंबेडकर तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ, घटनाकार, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक क्रांतीच्या चळवळीला प्रेरणा दिली आणि महिलांच्या व कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वांतत्र्यपूर्व भारताचे मजूरमंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. ज्ञानाच्या विविध शाखामध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे.

निबंध - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास/ निबंध लेखन 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करून दिली, त्यांच्यामध्ये लढाऊवृत्ती निर्माण करून समाजाला त्यांचे हक्क मिळवून दिले. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने मूलभूत कार्य अशा अनेक महत्वपूर्ण गोष्टी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा प्रेरणादायी संदेश दिला. विविध भाषा, धर्म, पंथ व जातीमध्ये विभागलेल्या भारताला संविधानाच्या माध्यमातून एक देश म्हणून एकसंध केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची प्रचंड आवड होती. ग्रंथांशिवाय आपण जगूच शकत नाही, असे त्यांचे मत होते. उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र पत्रकारिता, जलसंधारण अशा अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपुल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तके प्रबंध लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी 'राजगृह' नावाचे घर दादर, मुंबई येथे बांधले. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात विविध विषयांवरील हजारो दुर्मीळ ग्रंथांचा समावेश आहे. जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाचे पुस्तक घ्या व एक रुपयाची भाकरी घ्या, भाकरी तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला कसे जगायचे है शिकवेल, हे त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत. 


१४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती


जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू,मध्यप्रदेश)

स्मृती - ६  डिसेंबर १९५६ (दिल्ली)


भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते. 


शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही'' असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ''प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे. त्यांचे म्हणणे होते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले. डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, ''आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा'' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे.।स्त्रियांना पुरुषा प्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला. डॉ. आंबेडकर यांच्या कार्यास विनम्र अभिवादन !

Post a Comment

0 Comments

close