प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | Republic Day Speech in Marathi | 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्कृष्ट भाषण; टाळ्यांचा होईल कडकडाट
आदरणीय व्यासपीठ, सर्व गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रीणींनो, आज आपण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आजच्या या शुभदिनी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही विनंती.
स्वातंत्र्य वीरांना करुया, शत शत प्रणाम ! त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच, भारत देश बनला महान !
इंग्रजांच्या तावडीतून आपल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक थोर नेते आणि स्वातंत्र्यवीरांना बलिदान द्यावे लागले होते. त्यानंतर राज्यघटना लिहिण्याचे कठिण काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण केले. राज्य घटना लिहिण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. २६ जानेवारी १९५० ला आपल्या भारत देशात सविधान अंमलात आले. तेंव्हापासून आपल्या देशाला पूर्ण स्वतंत्र गणराज्य घोषित करण्यात आले, म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. या दिवसालाच भारतीय प्रजासत्ताक दिन असेही संबोधले जाते.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताचे संविधान हे 'संविधान समिती'ने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची म्हणजेच स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता. २६ जानेवारी या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती.
दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. या संचलनात प्रत्येक राज्याचे संघ सहभागी होतात. या दिवशी भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते.
मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक नेत्यांना आणि वीरांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. त्यामूळे त्यांना कधीच विसरून चालणार नाही. त्यांना आपण नेहमी स्मरणात ठेवले पाहिजे. त्यांच्या कार्याची ओळख कायम आपल्या स्मरणात राहिली पाहिजे. आपला देश आणखी कशी प्रगती करेल यावर आपण सर्वांनी काम केले पाहिजे. आपला देश जगात आणखी महान होण्यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न केले पाहिजेत.
जाता जाता शेवटी एवढेच म्हणेन...
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे दे वरचि असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे
!! वंदे मातरम् !!
जय हिंद! जय भारत!
0 Comments