शिक्षकेत्तर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करणेबाबत शासन निर्णय 25 मार्च 2026 | शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फतच होणार
महाराष्ट्र राज्य शासनाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिक्षक पदावर (शिक्षणसेवक) होणारी थेट नियुक्ती/पदोन्नती २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयाद्वारे कायमची बंद केली आहे. यापुढे ही नियुक्ती केवळ शैक्षणिक पात्रतेवर न होता, पवित्र पोर्टल (Pavitra Portal) द्वारे स्पर्धा परीक्षेतूनच करण्यात येणार आहे.
निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे:
जुनी तरतूद रद्द: शिक्षकेतर कर्मचारी (उदा. लिपिक, शिपाई) शैक्षणिक पात्रता पूर्ण करून शिक्षक पदावर रुजू होत होते, ती तरतूद आता रद्द करण्यात आली आहे.
कारणे: ही नियुक्ती पद्धत विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेवर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम करणारी असल्याने ती बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
अंमलबजावणी: ही तरतूद २० वर्षांनंतर अधिक्रमित (Cancel) करण्यात आली आहे.
नवीन नियम: आता कोणत्याही शिक्षकेतर कर्मचाऱ्याला थेट शिक्षक म्हणून नियुक्त करता येणार नाही. त्यांना शिक्षक होण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेत भाग घ्यावा लागेल.
परिणाम: या निर्णयामुळे, पूर्वलक्षी प्रभावाने ही तरतूद रद्द झाल्याने अनेक इच्छुक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून, शिक्षक संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे.
शासन निर्णय 25 मार्च 2026
प्रस्तावना:- राज्यात शिक्षक अभियोगयता व बुध्दीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा निर्णय सन २०१७ पासून शासनाने घेतलेला आहे. यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे. असे असताना उक्त संदर्भीय शासन पूरकपत्रकान्वये शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक/शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे, ही बाब विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. यास्तव सदरची तरतूद अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः
शासन पूरकपत्र दिनांक १०.०६.२००५ मधील परिच्छेद क्र. ८ येथे खालीलप्रमाणे तरतूद आहे -
"शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी वा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर, अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यास शिक्षणसेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षणसेवकांचेच मानधन आणि इतर सर्व अटी व शर्ती लागू होतील. मात्र अशा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल."
सदर तरतूद 25 मार्च 2026च्या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.



0 Comments