पुणे - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) संस्थेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त व किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या. यावेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,बालभारतीचे संचालक दिनकर पाटील,समन्वयक विवेक गोसावी,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्लास पवार,कवी इंद्रजित भालेराव आदी उपस्थित होते.
शाळांनी विद्यार्थ्यांना फीअभावी शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये. - शिक्षणमंत्री
शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. त्या पुणे येथे बालभारतीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होत्या. अनेक शाळा शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणून देत आहेत, त्यांना ऑनलाइन वर्गांना बसू दिले जात नसल्याचे प्रकार काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड बोलत होत्या.
५वी ते ८वी च्या शाळा सुरु...
राज्यात बुधवार २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानंतर आणि पालकांच्या पूर्वपरवानगीने विद्यार्थी शाळेत येणार आहेत. याबाबत गायकवाड म्हणाल्या, 'राज्यात सुरू झालेल्या शाळांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.'
स्कूल बस सुरु करणेबाबत
राज्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. मात्र स्कूल बसना अद्याप परवानगी मिळालेली नाही. स्कूल बस सुरू व्हावी अशी पालकांची मागणी आहे. याबाबत परिवहन विभागाशी चर्चा करणार असल्याची माहिती गायकवाड यांनी या कार्यक्रमात दिली.
बालभारतीतर्फे वर्षभरात स्वत:चे शैक्षणिक चॅनेल
दरम्यान, बालभारतीच्या नव्या वेबसाइटचे वर्षा गायकवाड यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आले. बालचित्रवाणीतील चांगले शैक्षणिक साहित्य पुनरुज्जीवित करून त्याचा वापर विद्यार्थ्यांसाठी केला जाणार आहे. तसेच बालभारतीतर्फे वर्षभरात स्वत:चे शैक्षणिक चॅनेल सुरू केला जाईल, अशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी केली.
किशोर मासिकाच्या मोबाईल ॲपचे उद्घाटन
किशोर मासिकाच्या मोबाइल ॲपचेही उद्घाटन गायकवाड यांनी केले. वर्षा गायकवाड यांनी वाचकांना विशेष भेट देत किशोरची वार्षिक वर्गणी केवळ 50 रुपये करण्याची घोषणा केली.तसेच वाचन संस्कृतीला चालना मिळावी,यासाठी बालभारतीने ग्रंथालय सुरू करावे,असेही आदेश दिले.
0 Comments