Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

*बालभारतीला २००९च्या शासननिर्णयाचा विसर! नव्या पद्धतीने संख्यावाचनावर आक्षेप*

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
सरकारी कार्यालये, निमसरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, मराठी पाठ्यपुस्तके इत्यादींमध्ये ज्या-ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होतो किंवा जिथे त्याचा वापर केला जाणार आहे; त्या ठिकाणी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इत्यादींसाठी देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला, अंक यांचा स्वीकार सरकारने केला होता. ६ नोव्हेंबर २००९ रोजी हा शासननिर्णय जाहीर करण्यात आला होता. या शासननिर्णयामध्ये अक्षरलेखनासंदर्भातील सूचनाही आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून अंकलेखनाची नवीन पद्धत राबवली जात आहे. यासंदर्भात आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आधीची वर्णमाला आणि जोडाक्षर पद्धत ही मराठी देवनागरी लिपीच्या परंपरेशी आणि संकेतांशी सुसंगत नव्हती. त्यामुळे मराठी लेखनात गोंधळ निर्माण होत होता. भाषातज्ज्ञांनी आधीच्या वर्णमाला लेखनातील त्रुटी समोर आणल्यानंतर सन २००२ मध्ये या सूचना सरकारला देण्यात आल्या. त्यानंतर याचा शासननिर्णय ६ नोव्हेंबर २००९ मध्ये काढण्यात आला. मराठी भाषेच्या लेखनात एकरूपता राखण्यासाठी या सूचनांचे काटेकोर पालन गरजेचे आहे, असेही या शासननिर्णयामध्ये नमूद करण्यात आले होते.
संख्यावाचनाची नवी पद्धत का आणली?
६ नोव्हेंबर २००९ मध्ये जाहीर केलेल्या शासननिर्णयात परिशिष्ट पाचमध्ये अंकांच्या प्रमाणीकृत अक्षरी लेखनाचा तक्ता देण्यात आला आहे. एकीकडे हा शासननिर्णय असताना याचा विचार न करता बालभारतीने नव्या पद्धतीने संख्यावाचनाची पद्धत कशी अंमलात आणली, असे विचारण्यात येत आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनीही या निर्णयाची आठवण करून दिली आहे. या निर्णयासाठी अनेक वर्षे मेहनत घेतल्यावरही तो दहा वर्षांनी दुर्लक्षित राहतो याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
या शासननिर्णयातील सूचना न पाळण्यासंदर्भात बालभारतीने कोणतेही जाहीर परिपत्रक काढले होते का? सरकारी संस्था सरकारी नियम डावलून दुसऱ्या पद्धतीने आपले निर्णय राबवू शकते का? एकाच राज्यात लेखनाच्या दोन पद्धती अस्तित्वात येऊ शकतात का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. संख्यावाचनामध्ये जोडाक्षरांमुळे विद्यार्थी गोंधळतात, असा दावा करताना यासाठी बालभारतीने तोडाक्षराची वापरलेली पद्धत अधिक कारणीभूत आहे, असाही यासंदर्भात मराठी भाषा अभ्यासकांकडून आरोप केला जात आहे. जोडाक्षरांची सोपी पद्धत या शासननिर्णयामध्ये दिलेली असताना पाय मोडून लिहिण्याच्या पद्धतीमुळे मुलांचा वाचताना गोंधळ होतो. त्यामुळे ही तोडाक्षरांची पद्धत बालभारतीने बदलली तर मुले अधिक योग्य पद्धतीने वाचू शकतील, असे सांगण्यात येत आहे. बालभारतीच्या पुस्तकामध्ये मोठ्या, गठ्ठा हे आडव्या मांडणीने लिहिले जाते. त्यामुळे विद्यार्थी असे शब्द वाचताना 'मोठया' किंवा 'गठठा' अशा पद्धतीने वाचण्याची शक्यता असते. शालेय पाठ्यपुस्तकामध्ये ज्या पद्धतीने लेखन होते तसे लेखन व्यवहारामध्ये होत नाही. वाचनाचे संस्कार केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नसते तर ते व्यवहारात वापरता यावे म्हणून केले जातात. याच उद्देशातून शासननिर्णयाची गांभीर्याने दखल घेण्यात यावी अशी मागणी मराठी अभ्यासकांकडून करण्यात येत आहे. तसेच या शासननिर्णयाचे उल्लंघन करण्याची कारणेही स्पष्ट व्हायला हवी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

close